भटकायला बहुतेकांना आवडत असते. त्यात मुलांना सुटी लागली की चार दिवस कौटुंबिक सहलीचे नियोजन केले जाते. पण हे भटकणे निरर्थक, केवळ मौजमजा असे न राहता निसर्गाचा अनुभव घेत, माणसांशी संवाद साधत, आजूबाजूच्या परिसरातील माहिती घेत केलेला प्रवास आनंददायी तर होतोच, शिवाय अशी भटकंती सार्थकी लागते.
अशा भटकणे महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत कसे करता येते हे ओंकार वर्तले यांनी 'सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती'मध्ये सांगितले आहे. सह्याद्रीत अनेक गड - किल्ले, लेण्या आहेत. यातील काही परीचित तर काही अपरिचित आहेत. आडवाटेवरील अप्रकाशित अशा अनवट ठिकाणांची माहिती त्यांनी पुस्तकात दिली आहे.
पद्मावती, गडद, काम्ब्रे, घोराडेश्वर, पाटेश्वर आणि लेण्यांचे वैभव लेखकाने शब्दातून समोर ठेवले आहे. खानदेशातील लळिंग, सोनगीर, झोडगे गौताळा, रामघळ तसेच नगर जिल्ह्यातील कलाडगड, रत्नागिरी संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर, नगर व नाशिकच्या सीमेवर उभे असलेले अलंग - मदन - कुलंग हे दुर्गत्रिकुट, सिंधुदुर्गातील विजयदुर्ग आदी ४५ ठिकाणांची ओळख , त्यांचा इतिहास, तेथील भटकंती, तेथे जाण्याचा मार्ग सांगितला आहे.